Monday, 25 July 2011
मला जरा का २५ वर्षे भूतकाळात जायला मिळाले तर...
२) परत एकदा खूप क्रिकेट खेळेन
३) संध्याकाळी सात...साडे-सातला मंद निरंजन तेवत असलेल्या देवघरापुढे उभा राहून शुभंकरोती म्हणेन
४) दूरदर्शन वरचे शनिवार आणि रविवारचे सिनेमे न चुकता बघेन
५) रात्री कसलीही चिंता न करता , आहेत न आई-बाबा सगळे बघायला, ह्या विचाराने शांत झोपेन
६) दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघेन
७) बेस्ट बसच्या वरच्या मजल्यावर बसून लांब फेरी मारेन
खरे म्हणजे हे होणे नाही . त्यामुळे सध्या मुलाला ह्या सगळ्या आठवणी सांगण्याचे निमित्त करून मीच त्या परत परत आठवतो आणि त्याच्या नकळत डोळ्यांच्या ओल्या झालेल्या कडा पुसतो
तो काळ थोडाफार अनुभवायच्या असेल तर हि साईट जरुर बघा - http://ddnational.blogspot.com/
Thursday, 21 July 2011
मराठी एअरवेज, फ्लाईट – मुंबई ते कोल्हापूर. फ्लाईट कॅप्टन – पाटील
जॉनी लिवरची छान कॉमेडी
मराठी एअरवेज फ्लाईट – मुंबई ते कोल्हापूर. फ्लाईट कॅप्टन – पाटील
http://www.youtube.com/watch?v=cYTk3RLLPX4
(* मराठीच्या अति-अभिमानी मंडळींनी कृपया हि वीडीओ क्लिप बघून स्वताचे आणि आमच्यावर टीका करण्यारया टिप्पणी लिहून आमचे ब्लड प्रेशर वाढवू नये. आम्हाला ह्यात काही मराठी लोकांची थट्टा केल्यासारखी वाटत नाही. वास्तविक ह्या बरोबर जॉनी लिवरने पंजाब एअरवेज, गुजरात एअरवेज असे देखील सादर केले होते. फक्त त्याच्या वीडीओ क्लिप आम्हाला मिळाल्या नाहीत)
Monday, 18 July 2011
देव आनंदच्या सिनेमांची प्रेक्षक संख्या
मी एका पुस्तकात (बहुदा शिरीष कणेकरांच्या) हा विनोद (अर्थात काल्पनिक) वाचला होता – देव आनंदचा नवीन सिनेमा रीलीज झाल्यावर देव आनंदने प्रत्येक चित्रपटगृहात फोन करून किती प्रेक्षक आहेत ह्याची चौकशी करायला सुरुवात केली. बहुतेक चित्रपटगृहे रिकामीच होती. शेवटी एका ठिकाणी काही प्रेक्षक आहेत असे कळल्यावर देव आनंदने मॅनेजरला विचारले कि – “आत मध्ये एकूण किती प्रेक्षक आहेत?” तेव्हा मॅनेजर म्हणाला – “ते मी तुम्हाला चित्रपट संपल्यावरच सांगेन कारण किती प्रेक्षक आहेत हे बघायला चित्रपटगृहाचे दार उघडले तर, आहेत ते प्रेक्षक पण निघून जातील”
Thursday, 14 July 2011
हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?
असे म्हणतात कि ज्यावेळी जँकसन, प्लेगच्या साथीचे कारण पुढे करून पुण्यात अत्याचार करत होता तेव्हा लोकमान्य टिळक पुण्यात नव्हते. ते परत आल्यावर त्यांनी एकच प्रश्न केला – “जँकसन अजून जिवंत कसा?” त्यानंतर चापेकर बंधूंनी जँकसनचा वध केला.
2G, आदर्श, कॉमनवेल्थ गेम्स, वाढती महागाई , सगळीकडे बोकाळेला भ्रष्टाचार आणि सतत होणारे बॉम्बस्फोट ह्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न थोडा बदलून विचारावासा वाटतो – “हे UPA सरकार अजून सत्तेवर कसे?”
दोन मिनिटे डोळे मिटून विचार करा आणि पुढच्या निवडणुकीत मतदानाला बाहेर पडा.
Wednesday, 13 July 2011
पावसाळयाची गाणी
आता पावसाळा व्यवास्थित चालू झाला आहे. त्याला अनुसरून काही पावसाळ्याची गाणी –
बरसात के मौसम मे - www.youtube.com/watch?v=T65m6QnRihU
बारिश का बहाना है - www.youtube.com/watch?v=73Yjzx2RqB0
रिम झिंम गिरे सावन - www.youtube.com/watch?v=cmD6GfZgKX8
(* हे गाणे मला नेहेमी फार हळवे करते. एक तर गाणे सुंदर आहेच आणि त्यात जुन्या मुंबईची दृश्ये दिसतात जी मला फार nostalgic करतात. १९७०-८० सालातील मुंबई. “How green was my valley” (*अर्थात हा हिरवे(green)पणा मुंबईच्या मानाने)
काली घटा छाये मोरा जिया तरसाये - www.youtube.com/watch?v=xpWmCWsgx5w
आणि अर्थात हा Master-Piece
एक लडकी भीगी भागी सी - http://www.youtube.com/watch?v=pV1cczPv4
ह्याशिवाय अजून देखील कैक गाणी आहेत पण ही आपली आमची लिस्ट.
(* २-३ 60 किंवा 90 [*सुज्ञास अधिक सांगणे न लगे], बरोबर काहीतरी चमचमीत खायला आणि त्याबरोबर हि गाणी. विचार करा. विकेंड काही फार लांब नाही आहे)
Monday, 11 July 2011
हल्ली कथाकथन कोणीच का करत नाही?
हल्ली फारसे कुणी कथाकथन करताना दिसत नाही. पूर्वी वपु काळे, द मा मिरासदार, पु ल देशपांडे ही मंडळी फार छान कथाकथन करायची. (* पुलंचे नाव यादीत शेवटी ठेवल्यामुळे पुल प्रेमींना राग येईल पण पुल हे वपु , द मा मिरासदार ह्यांच्या एव्हडे उत्तम कथाकथन नाही करू शकायचे. कथाकथनात वपु खरे MASTER. भदे, एकबोटे इत्यादि वपुंच्या आवाजातल्या कथा आठवून पहा. असो). हल्ली हि कला लोप पावल्यासारखी वाटते आहे. लेखक स्वत कथा सांगत आहे आणि श्रोते ती तल्लीन होऊन ऐकत आहेत हे दृश्यच किती छान असायचे. भदे, एकबोटे (वपु) बाबू पैलवान, नाना चेंगट (द मा), अंतू बरवा , सखाराम गटणे (पुल) ह्या व्यक्तीरेखा लोकांच्या मनात घर करून आहेत. कथाकाथानाला परत उत्तेजन दिले पाहिजे. तुम्हाला काय वाटते?
(* दमांची “”नाना नव्याण्णवबाद” ”म्हणून एक अप्रतिम कथा आहे. ती कुठल्या साईटवर असल्यास त्याची लिंक टिप्पणी मध्ये जरूर पोस्ट करावी)
Wednesday, 6 July 2011
लोकसत्ताकारांचा “सर्वोच्च मुर्खपणा”`
लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर हे नेहेमी कॉंग्रेसची भलामण करतात हे जगजाहीर आहे. आजचा अग्रलेख हा त्याचा नमुना आहे. पहिल्यांदा ह्या लिंक - http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=168562:2011-07-05-17-37-40&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7 वर त्यांची मुक्ताफळे वाचा मग आम्ही त्यातल्या मुद्द्यांचा व्यवस्थित समाचार घेणार आहोत –
लोकसत्ता अर्थात कुमार केतकर - अण्णा हजारे आणि मंडळींच्या म्हणण्यानुसार सर्व प्रस्थापित यंत्रणांच्या डोक्यावर अत्यंत सामथ्र्यशील अशी लोकपालासारखी यंत्रणा खरोखरच तयार झाली तर काय हाहाकार उडू शकतो ते सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या आदेशाने दाखवून दिले आहे.
आम्ही – वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार, दुबळा पंतप्रधान, मुजोर मंत्री, सीबीई गैरवापर ह्याच्याहून अधिक असा काय हाहाकार उडायचा रहायला आहे?
लोकसत्ता अर्थात कुमार केतकर - तीन खांबांवर उभ्या असलेल्या लोकशाही व्यवस्थेत एका खांबाने स्वत:कडे इतरांची भूमिका घेणे योग्य नव्हे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने हा धोका संभवतो.
आम्ही – कॉंग्रेसला धोका म्हणजे सगळ्या व्यवस्थेला धोका काय रे टोणगया. वास्तविक हि परिस्थिती आली कारण लोकनियुक्त सरकार आणि त्याचे प्रमुख म्हणजे पंतप्रधान हे काहीच करत नाहीत आहे. त्यांनी ह्यावर वेळीच कारवाई केली असती तर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपाचा प्रश्नच आला नसता. खरे म्हणजे अशा कसोटीच्या क्षणी व्यवस्था उत्तम चालत आहे. सरकार नालायक निघाले म्हणून सर्वोच्च न्यायालय पुढे येऊन त्याला वठणीवर आणत आहे.
कुमार केतकर - पण सरकारी यंत्रणा त्यांची उत्तरे देत नाही म्हणून स्वत:च न्यायालयाने तपास यंत्रणेत उडी घ्यावी, हे सर्वोच्च न्यायालयाच्या उंचीस शोभणारे नाही
आम्ही – आता तुला सगळ्यांच्या उंची-खोलीची काळजी वाटायला लागली काय. जेव्हा ह्या सरकारने पी.थोमास सारखा माणूस सीवीसी म्हणून नेमला तेव्हा सीवीसी पदाची उंची काय वाढली होती काय रे लम्बुजी?
कुमार केतकर - या न्यायालयीन शोध मोहिमेचे काही घातक दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे असतील. उदाहरणार्थ, ही नवी न्यायालयीन समिती केवळ हसन अली याच्याच काळय़ा पैशाचा शोध घेणार का? तसे असेल तर इतरांच्या काळय़ा पैशाचे काय? तसे नसल्यास फक्त हसन अलीच्या बाबतीत हा दुजाभाव का? आणि इतरांच्या काळय़ा पैशाचाही शोध घेण्याचे समजा न्यायालयाच्या समितीने ठरवल्यास ही समिती काय बँक तपासणीच्या कामातही उतरणार का? बँकिंग संदर्भातील अनेक बाबतीत रिझव्र्ह बँकेचा शब्द अंतिम मानला जातो. तेव्हा ही न्यायालयीन समिती रिझव्र्ह बँकेला मागे सारून स्वत:च बँकिंग नियामकाचे काम करणार का? त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा हा की, न्यायालयाला स्वत:कडेच सगळे अधिकार घ्यावयाचे असल्यास फक्त काळा पैसाच का, अन्य महत्त्वाच्या प्रलंबित खटल्यांची चौकशीही न्यायालयांनी स्वत:कडेच घ्यावी.
आम्ही – अरे वा , तसे भरपूर लिहिले आहेस पण हे सगळे आम्ही एका वाक्यात बसवू शकतो – “लांडगा आला रे आला” . उगाच पुढच्या काल्पनिक गोष्टींची भीती दाखवून हा तपास करू नका असे म्हणतोस काय रे कोल्हया
कुमार केतकर - वास्तविक काळय़ा पैशांसंदर्भात जनतेत दंतकथेच्या पातळीवर एक सुप्ताकर्षण आहे. पण त्यास वास्तवाचे भान नाही. परदेशी बँकांत ठेवलेला सगळाच पैसा काळा असे समजण्याची चूक आपल्याकडे बरेच करतात. मॉरिशस, लिचेन्स्टाइन आदी देशांचे उत्पन्न हे करपात्र नियमावलीवर आहे. म्हणजे त्या देशात नोंदलेल्या कंपन्यांनी करारमदार केल्यास त्यांना कर भरावा लागत नाही. ही व्यवस्था पूर्ण कायदेशीर आहे. खेरीज मॉरिशससारख्या देशाशी आपण दुहेरी करविरोधी करार केला आहे. म्हणजे त्या देशात नोंदलेल्या कंपन्यांनी तेथे कर भरल्यास आपल्याला पुन्हा त्यांच्यावर कर आकारता येत नाही. या व्यवस्थेचा फायदा घेऊन अनेक कंपन्यांनी आपली कार्यालये तेथे हलवली आहेत. त्यात बेकायदेशीर काही नाही. अनेक परदेशी बँका आपल्या खातेदारांची माहिती गुप्त राखतात. तेव्हा ती माहिती न देणे हे आपल्या माहिती अधिकाराचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे ती द्यायलाच हवी, असे अण्णा हजारे आदींनी म्हटल्यास ते समजण्यासारखे आहे. पण सर्वोच्च न्यायालयानेच असे म्हणावे हे अनाकलनीय आहे.
आम्ही – वा रे पठ्ठ्या. काय पण युक्तिवाद. ह्यात बेकायदेशीर असे आहे कि तिथे जमा झालेला पैश्यावर इथे जो कर भरावा लागतो न तो भरला नाही आहे. त्यासाठीच सर्वोच्च न्यायालय सरकारच्या पाठी लागले आहे.
कुमार केतकर - तेव्हा परदेशी बँकांतच काळा पैसा आहे, हा शुद्ध भाबडेपणा झाला. शिवाय तेथे जो पैसा जातो तो मॉरिशस आदी मार्गानी पांढरा होऊन भारतीय बाजारात येतो. तेव्हा, चला स्विस बँकांतील खाती खोलू आणि बॅगा भरभरून काळा पैसा घेऊन येऊ, असे जर काही जणांना वाटत असेल तर ते वास्तवाचे अज्ञानच दर्शवते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या अज्ञानाच्या प्रसारात भरच पडेल.
आम्ही – सगळा पैसा नसेल पण बराचसा आहे. तो तरी परत आणायला तुला काय प्रोब्लेम आहे. तुला वाटते आहे तसे कुणालाही वाटत नाही आहे. लोकांचे म्हणणे हेच आहे कि जो काळा पैसा परत मिळू शकतो तो तर आणा.
कुमार केतकर - यात भाजप आघाडीवर होता. त्या पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी ही सरकारला चपराक आहे, असे म्हटले आणि निर्णयाचे स्वागत केले हे त्यांच्या बालबुद्धीला साजेसेच झाले
आम्ही – बालबुद्धी ते नाहीत, तू आहेस. हा अग्रलेख ते सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.
शेवटी आमची कुमार केतकरला एक सूचना – थोडी कमी पीत जा किंवा पिण्याच्या आधी अग्रलेख लिहीत जा. म्हणजे तू काय लिहितो आहेस ते तुझ्या लिहितानाच लक्षात येईल.
अजून एक – तू पंतप्रधानच्या भेटीला “दिव्य मराठी” चा प्रतिनिधी म्हणून गेला होतास. हे नवीन काय. तू लोकसत्ताचा संपादक न मग हे नवीन दिव्य प्रकाशन कुठले
Tuesday, 5 July 2011
महाराष्ट्र टाईम्स मधील मुद्राराक्षसाचे विनोद, दिव्य बातम्या , हसा लेको आणि इतर “वाचनीय” सदरे
हा पेपर रोजच्या रोज मराठीचा खून पाडत असतो. अहो संपादक, बातम्या महत्वाच्या आहेत हे ठीक आहे पण भाषेकडे देखील जरा लक्ष द्या. “अमृतातेही पैजा जिंके” अशा मराठी भाषेचे एवढे धिंडवडे काढू नका. आणि हो, पोयरेकरांची व्यंगचित्रे बंद करा, लवकरात लवकर. अहो तुमच्या पेपर मध्ये पूर्वी आर के लक्ष्मण व्यंगचित्रे काढायचे. त्यानंतर पोयरेकर म्हणजे ताजमहाल पाहिल्यानंतर नंतर एकदम धारावी पाहण्यासारखे आहे. पेपरमध्ये व्यंगचित्रे हवीतच असा तुमचा आग्रह असेल तर आर के लक्ष्मण यांची जुनी व्यंगचित्रे परत छापली तरी चालतील. निदान पुनर्प्रत्याचा आनंद.
वानगीदाखल महाराष्ट्र टाईम्स मधील खालील उदाहरणे पहा. इटालिक लिपी मधील मते अर्थात आमची.
“उद्योगपती अनिल अंबानी आणि बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींची न्यूट्रिशनिस्ट असलेल्या मराठमोठ्या ऋजुता दिवेकरला नेपाळमध्येही गौरविण्यात आले”
आम्ही - मराठमोठ्या का मराठमोळ्या ??
“झुकेरबर्गची श्रीमंतीची झेप!”
आम्ही - अहो हा मथळा असा हवा – "झुकेरबर्गच्या श्रीमंतीची झेप!"
“दरम्यान , गेला जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने राज्यात सर्वत्र पेरण्याखोळंबल्या आहेत . चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ १८१ मिमी पावसाची नोंदझाली असून , १ लाख ५८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे . आणखी दोनदिवस पाऊस झाला नाही , तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यताआहे . पेरणी झाल्यानंतरचे दोन दिवस वगळले , तर सातत्याने पावसाची गरज असते. मात्र यावेळी पेरलेले बी पावसाअभावी जळून जाण्याची शक्यता आहे .”
आम्ही - ही बातमी लिहीत आहात का मराठी दुसऱ्या ईयत्तेसाठी शुध्लेखनाचा धडा. तुम्ही पेपर मध्ये लिहीत आहात. जरा “वाचनीय” लिहा.
आणि हसा लेको नावाच्या महा आचरट सदरातील दोन “विनोद” -
भिकारी : माय भाकरी दे. आजी : अजून भाकरी झाल्या नाहीत...
भिकारी : माझा मोबाइल नंबर घे आणि भाकरी झाल्यावर मिस कॉल दे!!!
आजी : मिस कॉल कशाला भाकरी झाली की, मी माझं फेसबुक स्टटस अपडेट करते ते बघ आणि ये!!!
चार आणे बंद करण्याचे कारण ...अगदी सोपे आहे .
सरकार एक अण्णा नीट सांभाळूशकत नाही .. ते चार आणा कसे काय सांभाळूशकेल ..??
(*असे “विनोद” दिवसाला एक ह्या गतीने महाराष्ट्र टाईम्स मध्ये येतात. धाडसी वाचकांनी ते वाचण्यासाठी हि लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/2428942.cms क्लीक करावी [*आपल्या जबाबदारीवर]. आमचा रेकॉर्ड न थांबता सलग तीन विनोद वाचण्याचा (सहन करण्याचा) आहे. )