हल्ली दिव्यांच्या झगमगात काळोखच हरवला आहे. पूर्वी काय छान काळोख पडायचा. मोठ्या शहरांमधून देखील रात्री ९ नंतर हळू हळू सगळे शांत होऊ लागायचे. रस्ते शांत व्हायचे. रहदारी कमी व्हायची . बागेच्याजवळ वैगेरे असाल तर रातकिड्यांचे आवाज देखील ऐकू येऊ लागायाचे. ग्यालरीत , जिन्यात , गच्चीत , नाक्यावर मंडळी गप्पा मारायला जमायची. दिवसभराच्या गप्पा, मध्येच कुणाचीतरी मस्करी , राजकारण , खेळ असे काही-बाही विषय निघायचे. थोडा आचरटपणा असायचा. पण ह्या सगळ्यामुळे दिवसभराचा ताण हलका व्हायचा. मनमोकळे हसून घेता यायचे (दुसऱ्यांवर आणी स्वतः वरही)
आमच्या घरापासून स्टेशन जवळ जवळ २ किमी लांब होते पण तिकडच्या गाडीच्या शिट्टीचा आवाज रात्रीच्या शांत वेळी स्पष्ट ऐकू यायचा. झालाच तर बेस्टच्या बसचा आवाज. एखाद्या truck चा आवाज , असे सगळे ऐकताना झोप कधी यायची कळायचेच नाही. परत सकाळी मंडळी उत्साहाने कामाला तयार.
आताशा नीट काळोखच पडत नाही. टीवी तर रात्री उशिरापर्यंत चालू असतो. FaceBook वर chat करताना गप्पांचा फड मात्र रंगत नाही. रस्ते शांत होत नाहीत. लांबवरून ऐकू येणारी आगगाडीची शिटी तर कैक दिवसात ऐकली नाही. आणी रातकिड्यांची किरकिर , ती तर आता एखाद्या हॉरर सिरीयल मध्येच ऐकायला मिळते.
खरोखर पूर्वीसारखा शांत काळोख परत पडला पाहिजे .
(* हे लिहिताना आठवण झाली – पुलंचा केवळ “आवाज” ह्या विषयावरती एक अप्रतिम लेख आहे. जरूर वाचा. ह्यात रात्रीच्या आवाजांच्या वरती फार सुंदर लिहिले आहे. खासकरून कुल्फिवाल्याचा आवाजाविषयी. त्या लेखाचा काही भाग ह्या ब्लॉग वर - http://cooldeepak.blogspot.com/2008/11/blog-post.html आहे. पुस्तकाचे नाव – “उरले सुरले” लेखाचे नाव (बहुतेक) –“आवाज आवाज”)
ह्याच ब्लॉग असलेली पुलंच्या किश्श्यांची अप्रतिम लिंक - http://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post_04.html)